सांगली - येथील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. झपाट्याने या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगलीतील नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. कोयना आणि चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मात्र, ही वाढ नदीपात्रातच राहील. पण तरीही नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा-राजकारणात प्रवेश केल्यास प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य गमावून बसेन - नाना पाटेकर
कृष्णेची पाणी पातळी गुरुवारी सायंकाळी 21 फुटांवर पोहचली आहे. त्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यात महापुरामुळे हाहाकार उडवलेल्या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महापूर ओसरुन अवघे वीस दिवस झालेले असताना, पुन्हा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना आणि सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे ही वाढ सुरू झाली आहे. कोयना धरणातून 86 हजार क्युसेक तर दुसऱ्या बाजूला चांदोली धरणातून 16 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून कृष्णा नदीची पाणीपातळी 34 फुटांपर्यंत पोहचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत जरी वाढ होत असली, तरी ही वाढ नदीपात्रामध्ये राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले आहे.