रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा सध्या चांगलाच बोजवारा उडाला आहे. जिल्हा दौऱ्यावर आलेले परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनीही यावरून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
जिल्हा रुग्णालय म्हणजे जिल्हाभरातील गोरगरीब जनतेची लाईफलाईन. जिल्हा रुग्णालयात दररोज 800 हून अधिक रुग्ण येत असतात. मात्र येथे मुख्य डॉक्टरांबरोबरच इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत. सिटीस्कॅन तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ येथे नाहीत. या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अतिरिक्त ताण येथील आरोग्य यंत्रणेवर पडत आहे.
हेही वाचा - गुहागरमधील गिमवी मुंढर माळरानावर भीषण वणवा, शेकडो एकर वनसंपदा जळून खाक
या समस्या असतानाच अनेक वैद्यकीय बिलांच्या फाईल्सही जिल्हा शल्य चिकित्सक मंजूर करत नसल्याचीही ओरड आहे. त्यात रुग्णालयात स्वच्छतेचाही बोजवारा उडालेला आहे. दरम्यान, पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत या सर्व समस्यांवरून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालयातील त्रुटींवर नाराजी व्यक्त करत क्षुल्लक गोष्टीसाठी मुंबईतून येथे कोणी यायला हवं का? असा सवाल करत जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची असलेली कमतरता दूर करण्यासाठी लवकरच आरोग्य मत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामध्ये पालकमंत्र्यांनीच आता लक्ष घातल्याने रुग्णालयाचा कारभार आता तरी सुधारेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - रत्नागिरीमध्ये मुरुड समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला ५७ फुटांचा ब्लू व्हेल मासा