रत्नागिरी - भूस्खलन तसेच जमिनीला भेगा पडण्याचे सत्र सुरूच आहे. संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस थुळवाडीतही जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे 22 घरांना धोका निर्माण झाला आहे.
मुळसधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होताना पहायला मिळत आहे. फुणगुस थुळवाडी परिसरातील जमिनीला चक्क तडे गेले आहेत. आठ दिवसापूर्वी हे निदर्शनास आले. सुरुवातीला शंकर कुलकर्णी यांच्या घराच्या समोरच जमिनीला भेगा गेल्या. दरम्यान आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी जमिनीला भेगा जाऊन ते रुंदावत असल्याचे समोर आले. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या भेगा काही घरांपर्यंत देखील पोहोचल्या आहेत. या भेगांमुळे परिसरातील जवळपास घरांना धोका निर्माण झाला आहे. जर भेगा पडलेली जमीन खचली आणि घसरू लागली तर मात्र आजूबाजूच्या मोठ्या मातीच्या घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मात्र या भेगा सध्या रुंदावत असून महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी भूस्खलन होत असून 5 ते 6 ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणीही पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.