रायगड- रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अनंत गीते व महाघाडीचे सुनील तटकरे यांच्यात लढत झाली असून दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. लढत अटीतटीची झाली असून शेवटच्या फेरीपर्यंत विजयासाठी झगडावे लागणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सोनावडेकर यांनी सांगितले. तसेच निवडून येणाऱ्या खासदाराने रायगडच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
रायगड लोकसभा निवडणुकीत १६ उमेदवार यावेळी निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र, खरी लढत ही सुनील तटकरे व अनंत गीते याच्यात झाली आहे. दोन्ही उमेदवार हे बलाढ्य असून यापैकी कोण येणार हे सांगणे कठीण असले तरी निकाल हा अटीतटीची होणार, यात शंका नाही असे मत जेष्ठ पत्रकार प्रकाश सोनावडेकर यांनी मांडले.
रायगड जिल्हा हा पर्यटन, औद्यगिक दृष्ट्या महत्वाचा आहे. तसेच अलिबाग ही रायगडची राजधानी असून याठिकाणी रेल्वे येणे ही गरजेची आहे. अनंत गीते यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही. त्याचबरोबर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या औद्यगिक कंपन्यांच्या अनुषंगाने येथे लागणारे कर्मचारी तयार करण्यासाठी शिक्षण संस्था उभारणेही गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार संधी मिळू शकतील. यासाठी खासदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे सोनावडेकर म्हणाले.