रायगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या शेती विधेयकाविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश लाड याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने शेती विधेयक रद्द करण्याची मागणी या ठिय्या आंदोलनातून केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने कर्जत तहसीलदार यांना दिले आहे.
प्रांताधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन-
कर्जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज माजी आमदार सुरेश लाड याच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध व्यक्त केला. माजी जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसुरकर, शिक्षण आरोग्य सभापती सुधाकर घारे, माजी जिप सभापती नरेश पाटील, खालापुर तालुका अध्यक्ष एच आर पाटील, कर्जत तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या आहेत आंदोलनकर्त्याच्या मागण्या-
नवीन कृषी कायदा रद्द करा, शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी कायदेशीर तरतूद करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यवाही करा, भांडवलदारांचा हस्तक्षेप नको, अशा अनेक मागण्या आंदोलनकर्त्यांनी सरकार समोर ठेवल्या आहेत. केंद्र सरकारने वेळीच यावर तोडगा काढून देशाच्या अन्नदात्याला न्याय द्या अन्यथा याचे परिणाम हे केंद्र सरकारला भोगावे लागणार असा इशाराही यानिमित्ताने आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
हेही वाचा- महापरिनिर्वाण दिन : सकाळी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना शासकीय सलामी
हेही वाचा- EXCLUSIVE : राज्यात रक्ताचा तुटवडा, शक्य त्यांनी रक्तदान करावे - दिलीप वळसे-पाटील