पेण: होलिकोत्सवाच्या (Holikotsav) या उत्सवाला शिमगोत्सव असे देखील म्हटले जाते. पेण तालुक्यात 10 ते 15 दिवस अगोदरच या उत्सवाची उत्कंठा शिगेला लागलेली असते. होलिकोत्सवाची तयारी करणे, गावातील घराघरांत वर्गणी मागणे, ज्या ठिकाणी उत्सव साजरा होणार आहे तेथील स्वच्छता, सुशोभीकरण करणे, होळी पेटविण्यासाठी लागणारी लाकडे - ओंडके गोळा करणे, होळी उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये विविध प्रकारची जनजागृती करण्यासाठीच्या योजना आखणे आदी प्रकारची जय्यत तयारी आत्तापासूनच पेणमधील विविध विविध मंडळे व नागरिक करत आहेत.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याचा विचार करता पेणमध्ये मोठमोठ्या गगनचुंबी होळ्या उभारल्या जातात. जवळपास 70 ते 100 फूट उंच अशा या गगनचुंबी होळ्या पाहण्यासाठी तालुक्यातीलच नव्हे तर बाहेरील नागरिक देखील पेण मध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. या होळ्या उभारण्यासाठी बाजूच्या जंगलातून सावरीच्या झाडाचा ओंडका आणला जातो. हा ओंडका आणताना जोरजोरात बोंब मारणे, नाचगाणे करणे व जंगल भोजन करणे अशा प्रकारे ढोल ताशांच्या गजरात ही होळी आणली जाते. या आणलेल्या होळीला मखराची सजावट केली जाते. मखर जोडल्यानंतर ही होळी उभी करण्याची खरी मोठी कसरत असते. जवळपास दीडशे ते दोनशे लोकं एकत्र येऊन मोठ्या गाजावाजात आणि अतिशय शिताफीने ही होळी उभी केली जाते. त्यावेळी देखील असंख्य नागरिक हा चित्तथरारक क्षण पाहण्यासाठी उपस्थित असतात.

पेण शहरामधील कोळीवाडा, कुंभार आळी, नंदीमाळ नाका, कउंडाळ तलाव, बाजारपेठ तर ग्रामीण भागातील दादर, जोहे, वाशी, रावे, पाबळ, हमरापूर, वडखळ, गडब, जिते आदी ठिकाणच्या होळ्या नागरिकांसाठी आकर्षण ठरत असतात. त्यापैकी कोळीवाडा येथील होलिकामाते जवळील कोळी गीते आणि त्यावरील सुरू असणारे कोळीडान्स तसेच तेथे असणारी 80 किलोची दगडाची गोटी उचलण्याची स्पर्धा हे एक वेगळेच आकर्षण असते. साधारण 10 ते 15 दिवस जय्यत तयारी करून उभारण्यात आलेल्या या होळीचे होळीपौर्णिमेच्या दिवशी पूजन करून आणि विशेष महत्त्व असणाऱ्या पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून मध्यरात्री बारा वाजता या होळीला आरती करून झाल्यावर अग्नी देण्यात येते. होळी पौर्णिमेनंतर सलग पाच दिवस म्हणजेच रंगपंचमी पर्यंत या होळीची अग्नी सतत तेवत ठेऊन या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून आणि या अग्नीवर विविध प्रकारचे पदार्थ तयार करून या होळीच्या माळावर होळी उत्सव साजरा केला जातो. जळालेली होळी काढून पाण्यात विसर्जन करताना सुद्धा गावकऱ्यांची कसरत होते.