रायगड - 2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी गणराय मोठ्या दिमाखात गणेशभक्तांच्या घरोघरी मखरात स्थानापन्न झाले. गणेश चतुर्थी दिवशी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणरायाचे आज मंगळवारी विसर्जन झाले. यावेळी गणेशभक्तांनी साश्रुनयनांनी समुद्र, तलाव, नदी, कृत्रिम तळे यामध्ये पारंपरिक वाद्यासह नाचत, वाजत-गाजत, जयघोषात बाप्पाला निरोप दिला.
हेही वाचा-उरण ओएनजीसी अग्नितांडव : चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; चार जणांचा मृत्यू
विसर्जनाला पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात गणेशभक्त हिरमुसले असले तरी बाप्पाला आनंदाने निरोप देण्यात आला. गणरायाचे 2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी आगमन झाले होते. दीड दिवसाच्या गणरायाचे आज विसर्जन असल्याने समुद्र, नदी, तलावाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले होते. एकेरी वाहतूक चालू ठेवण्यात आली होती. गणरायाच्या रस्त्यावरुन मोठ-मोठ्या मिरवणुका निघाल्या होत्या. पारंपरिक वाद्याचा वापर यावेळी मिरवणुकीत करण्यात आला होता. पाऊस पडत असला तरी गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला पावसात भिजत निरोप देत होते.
समुद्र, नदी, तलाव परिसरात स्थानिक प्रशासनाकडून गणेशभक्तांसाठी योग्य सुविधा करण्यात आल्या होत्या. अलिबाग समुद्र किनारी नगरपालिका प्रशासनाकडून निर्माल्य ठेवण्यात आले होते. यात हार, पूजेचे साहित्य टाकले जात होते. तर समुद्र किनारी जीवरक्षकही तैनात करण्यात आले असून विसर्जनासाठी विजेची सुविधा करण्यात आलेली आहे. तर जिल्हा पोलीस दलाकडूनही विसर्जन ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.