रायगड - जिल्ह्यात समुद्र, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनात वाढ होत असताना आता मत्स्य पर्यटनालाही वाव देण्यासाठी जिल्हा मत्स्य विभागाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यात येणारा पर्यटक हा निसर्गाचा आनंद घेत असताना येथील ताज्या मासळीवरही चांगलाच ताव मारत असतो. मत्स्य विभागाने मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गर्दीच्या समुद्र किनारी खवय्यांसाठी परदेशी पद्धतीने वाहनातून वेगवेगळ्या पद्धतीचे मच्छी फूड स्टॉल निर्माण करण्याची योजना आखली आहे. त्याचबरोबर पर्यटकांसाठी मत्स्य संग्रहालय आणि माशांबाबत माहिती स्टॉलही उभारले जाणार आहे. तसेच समुद्रकिनारी असलेल्या शंख, शिंपले यांच्या वस्तू बनवून ते महिला बचत गटांना विक्रीस देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे मत्स्य पर्यटनालाही चांगली चालना मिळू शकते, अशी माहिती जिल्हा मत्स्य सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी दिली.
रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे लाखो पर्यटक येत असतात. जिल्ह्यातील समुद्र किनारा, ऐतिहासिक गड-किल्ले, धार्मिक स्थळे या ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देत असतात. एकीकडे हे पर्यटन होत असताना जिल्ह्यात मत्स्य संपदाही मोठी असल्याने येणारा पर्यटक येथील ताज्या माशांवर आडवा हात मारल्याशिवाय जात नाही. समुद्रातून येणारी ताजी मासळी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक पर्वणी असते. पापलेट, सुरमई, जिताडा, कोळंबी, खेकडे, कर्ली यासारखी मासळी जिल्ह्यात मिळत आहे. जिल्ह्यात खास मासे खाण्यासाठीही अनेक पर्यटक आवर्जून येत असतात.
हेही वाचा - पुण्यातील काकांचा अनोखा ध्यास, कचरा जिरवून फुलवली बाग
समुद्रकिनारी बहरणार मत्स्य पर्यटन
जिल्ह्यात समुद्र, गड-किल्ले, धार्मिक स्थळे ही पर्यटन क्षेत्रे पर्यटकांनी बहरलेली असताना आता मत्स्य पर्यटनालाही चालना देण्यासाठी मत्स्य विभागाने पावले उचलली आहे. जिल्ह्यात अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, रेवदंडा, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे मुख्य समुद्रकिनारे आहेत. हजारो पर्यटक या समुद्रकिनारी भेट देत असतात. त्यांना समुद्रावरच ताजे मासे खाण्याचा आनंद मिळावा; शिवाय, माशांविषयी माहिती, समुद्रातील शंख, शिंपले याच्या बनविलेल्या वस्तू ह्या समुद्र किनारीच पर्यटकांना उपलब्द करून दिल्यास मत्स्य पर्यटनाला चालना मिळणार आहे.

मत्स्य विभागाच्या मत्स्य संपदा योजनेतून पर्यटकांची गर्दी असणाऱ्या समुद्रकिनारी परदेशी धर्तीवर मत्स्य फूड स्टॉल उभारण्याची योजना आखली आहे. यामध्ये समुद्रातील ताजी मासळीचे विविध तयार केलेले चविष्ट प्रकार खवय्यांना खाण्यास मिळू शकतात. यासाठी बचत गटांना विभागामार्फत वाहन खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर विविध माशांची माहिती, संग्रहालय याचीही योजना आखण्यात येत आहे. समुद्रकिनारी असलेल्या शंख, शिंपल्यांच्या विविध वस्तू तयार करून ते बचत गटांमार्फत पर्यटकांना खरेदीस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मत्स्य पर्यटनाला चालना मिळून स्थानिकानाही रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मत्स्य जेट्टी उभारण्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी मच्छी लिलावही काही काळानंतर सुरू होणार आहे. त्यातूनही मत्स्य पर्यटनाला चालना मिळणार असल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी दिली.
हेही वाचा - एक मोहीम अशीही...! लोकबिरादरीत शिकणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी सायकलिस्ट डॉक्टर मैदानात