रायगड - लोकसभेचीही निवडणूक यावेळी मला खूप सोपी असून रायगड व रत्नागिरीच्या मतदारांनी मला स्वीकारले आहे. यावेळी मी दीड लाख मताने निवडून येईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी यावेळी व्यक्त केला. तर मतदार राष्ट्रहितासाठी व सुरक्षेसाठी शिवसेना-भाजपच्या बरोबरच राहणार, असा विश्वासही गीते यांनी बोलून दाखविला.
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सकाळी अलिबागमधील मतदार केंद्राना भेट दिली. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही निवडणूक माझ्यासाठी यावेळी खूप सोपी आहे. रायगड व रत्नागिरी मतदारसंघातील मतदारांनी सहा वेळा खासदार म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे यावेळीही मी दीड लाख मतांनी निवडून येणार आहे. तसेच विरोधक एकत्र आले असले तरी याचा काही उपयोग होणार नाही असा विश्वास बोलून दाखवला.
मतदारांना काय आवाहन करणार याबाबत विचारले असता, मतदारांना तर खरे आवाहन करण्याची आता गरज राहिलेली नाही. कारण मतदारांनी ठरवले आहे की, राष्ट्र हितासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तर रायगडच्या विकासासाठी माझ्या सोबत आहेत. त्यामुळे माझा विजय नक्की आहे. असे गीते यांनी सांगितले.