रायगड - उरणमधील दिव्यांगांनी विविध मागण्यांसाठी अपंग दिनानिमित्ताने सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण सध्या 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी कॅम्पमध्ये तपासणी झालेले 67+38 दिव्यांग व्यक्तींना पुढील 15 दिवसात अपंग असल्याचे दाखले देण्याचे मान्य केले. त्यामुळे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या अपंगांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - चेन्नईच्या रेल्वे कारखान्यातून मध्य रेल्वेच्या ताफ्यात एसी लोकल दाखल
उरणमधील सर्व अपंग व्यक्तींचा कॅम्प जेएनपीटी टाऊनशिप आणि उरण सरकारी रुग्णालयामध्ये नऊ महिन्यांपूर्वी झाला होता. त्या कॅम्पमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी आणि स्वतः सिव्हिल सर्जन डॉ. गवळीदेखील हजर होते. या कॅम्पमध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांची जुनी मूळ अपंग प्रमाणपत्रेदेखील घेण्यात आली आणि पुढील 15 दिवसात नवीन ऑनलाईन प्रमाणपत्रे देतो, असे सांगण्यात आले. परंतु, नऊ महिने होऊन गेले तरी त्यांना अजूनपर्यंत कोणतेही प्रमाणपत्र मिळालेले नाही. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. असे अनेक कॅम्प रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात घेण्यात आले आणि तिथेदेखील हाच प्रकार घडत आहे. परंतु, उरण तालुक्यातील अपंग व्यक्ती सुशिक्षित आणि लढाऊ बाण्याच्या असल्यामुळे त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. महादेव पाटील (खोपटा), महेंद्र पाटील (बोकादविरा) या दोन अपंग व्यक्तींनी पुढाकार घेत नऊ महिने संबधित विभागाशी पत्र व्यवहार करून जाब विचारला. पण त्यांना कोणतीही माहिती दिली नाही किंवा आश्वासन दिले नाही. शेवटी उपोषणाचा निर्णय झाल्यावर गवळी यांचे फोन येऊ लागले आहेत. पण त्यांच्यावरील दिव्यांग व्यक्तींचा विश्वास उडाल्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.
अपंग दिनी सुरू झालेले हे उपोषण सध्या 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिव्यांगांना लिंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. तसेच ज्यांची कागदपत्रे गहाळ केली आणि तपासणी केलेली नाही अशा दिव्यांगांना पुन्हा एक कॅम्प पुढील 15 दिवसात घेवून त्यांची अपंग प्रमाणपत्रे एक महिन्याच्या आत देण्याचे लेखी कबूल केले आहे. सर्व दिव्यांग बांधवांना पिवळे अंत्योदय रेशन कार्ड देण्यास नायब तहसीलदार पेडवी यांनी आश्वासन दिले. राजीव गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वांचे सध्या स्थितीत असलेल्या कागदपत्रांच्या आधारे पूर्ण करणार, असे आश्वासन देण्यात आले. 5 टक्के नोकर्यांसंदर्भात पत्र व्यवहार करून त्या संदर्भात पुढील प्रयत्न तहसीलदार करणार आहेत, असे आश्वासन उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले.
या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यामुळे तीन दिवस चाललेले बेमुदत साखळी उपोषण मागे घेतले आहे. परंतु, जर पुढील 15 दिवसात दाखले मिळाले नाहीत तर, आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा अपंग संघटनेच्यावतीने दिला आहे.