पुणे - मावळ लोकसभा मतदार संघात मावळ्याचे सरकार हवे की मावळला गोळीबार करणाऱ्याचे, असा सवाल शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत राष्ट्रवादीवर टीका केली. ते आज मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.
मावळ लोकसभा निवडणुकीत विरोधकांना घरी बसवायचे आहे. सध्या मावळ लोकसभा मतदार संघात काही हजार लोक आले आहेत. मात्र, बारामतीची भानामती येथे चालणार नसल्याचे ते म्हणाले. गेल्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे. आताच्या लोकसभेत देखील तेच होणार आहे, असे वक्तव्य त्यांनी याप्रचार सभेत केले.
शिरूर लोकसभा मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे निवडणूक लढवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. ती भूमिका मालिकेपुरती आहे. त्यामुळे भगव्याला मत देऊ नका, असे उर्मट बोलणाऱ्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मत द्या सांगू शकतात का? अशा नालायकांना मत देऊ शकतात का? असे म्हणत शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा खरपूस समाचार ठाकरेंनी घेतला.
यावेळी शिवसेनेचे संजय राऊत,आमदार लक्ष्मण जगताप,खासदार श्रीरंग बारणे,आमदार गौतम चाबुकस्वारश कार्यकर्ते उपस्थित होते.