पुणे - सतत शिवीगाळ करणाऱ्या आणि धमकावणाऱ्या मित्राला फिरायला जाण्याच्या बहाण्याने वरंधा घाटात नेऊन त्याचा खून केला आणि मृतदेह खोल दरीत फेकून दिला. ही घटना तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आली असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. गणेश यशवंत चव्हाण (वय 23), सुनील शंकर वसवे (वय 23), विशाल श्रीकांत जाधव (वय 23) आणि दशरथ शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, दीपक बापू वाडकर (वय 21) असे हत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत चौकशी सुरू असताना आरोपींनी दीड वर्षापूर्वी केलेल्या या हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पुण्यातील एका गिर्यारोहण संस्थेच्या मदतीने वरंधा घाटात 600 फूट खोल उतरून झाडाझुडपात पाहणी केली असता कुजलेल्या अवस्थेत मानवी शरीराचे अवशेष सापडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दीपक वाडकर आणि आरोपी एकमेकांचे मित्र असून बिबवेवाडी परिसरात राहण्यास होते. दीपक वाडकर हा शिवीगाळ करतो, धमकावतो म्हणून आरोपींनी त्याची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर त्याला फिरायला जाण्याच्या बहाण्याने वरंधा घाटात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्याला दारू पाजली आणि कोयत्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला.
हेही वाचा - दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; 2 लाख 90 हजारांच्या दुचाकी हस्तगत