पुणे - राज्य लोकसेवा आयोग हे प्रकरण हाताळण्यासाठी कुठे तरी कमी पडले आहे. विद्यार्थ्यांसोबत जे झाले ते दुर्दैवी होते. कुठल्याही विद्यार्थ्यांवर असे रस्त्यावर उतरण्याची वेळ येता कामा नये. कालच्या प्रकरणात विद्यार्थ्यांना शंभर टक्के त्रास झाला. यासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. गुरुवारी झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना पुण्यातील विधानभवन येथे झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, राज्य लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे. यामध्ये कुणीही राजकारण आणू नये. परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना आमचाही पाठिंबा आहे. परंतु, यामध्ये राजकारण केले जात आहे. सरकार काहीतरी वेगळे करत असल्याचे भासवण्यात येत आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याप्रकरणात लक्ष घालत वेगवेगळ्या ठिकाणावरून अहवाल मागवला होता आणि आज सकाळी पत्रक काढून परीक्षेची तारीख जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली
या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक दिवस अभ्यास केला आहे. काहींचे वयसुद्धा निघून जाते. त्यामुळे ही मुले अस्वस्थ झाली होती. त्यामुळे काल झालेल्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून राज्यसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या तीनही परीक्षा वेळेत घेणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यास चालू ठेवण्यासाठी सांगितले आहे. यावर निश्चित मार्ग काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा - मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी बोलाविली मराठा नेत्यांची बैठक
हेही वाचा - लबाड सरकारची बेबंदशाही; एमपीएससी प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांचा निशाणा