पुणे - आज दुसऱ्यांदा होत असलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ पहायला मिळाला आहे. पुण्यात 123 केंद्रावर होत असलेली परीक्षेत 13 ते 14 केंद्रावर अधिकारी वर्गच पोहचले नसल्याने 10 वाजता सुरू होणारी परीक्षा 11.30 वाजता देखील सुरू झाली नव्हती. त्यामुळे ही परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात यावी आणि ज्या जिल्ह्यातून विद्यार्थी हे आलेले आहेत. त्याच जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.
'न्यासा कम्युनिकेशनच जबाबदार' -
पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ पहायला मिळाला. राज्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी या परीक्षेला आले आहेत. 10 वाजता परीक्षा सुरू होईल, या आशेने रात्र बे रात्री आलेले विद्यार्थ्यांना मोठ्या गोंधळाला सामोरे जावे लागले आहे. न्यासा कम्युनिकेशनच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात येत आहे. पूर्णपणे जबाबदारी ही न्यासा कम्युनिकेशनची आहे. न्यासा कम्युनिकेशनच्या माध्यमातून 26 सुपरवायझर नेमण्यात आले होते. पण 13 ठिकाणी हे सुपरवायझर आले नव्हते. पण आता विद्यार्थ्यांना पेपर आणि 2 तास वेळ वाढवून देण्यात आली आहे. जे काही झालेले आहे, त्याला न्यासा कम्युनिकेशनच जबाबदार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी दिली आहे.
हेही वाचा - आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार : नाशिकमधील गिरणारे केंद्रावर उडाला गोंधळ