परभणी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदाच्या वर्षी निकालात प्रंचड प्रमाणात घसरण झाली असून जिल्ह्यातील केवळ 66.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये देखील नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. 75.53 टक्के मुली तर 59.53 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. औरंगाबाद विभागात परभणीचा विचार केला असता, जिल्ह्याचा निकालाचा क्रमंका खालून दुसरा लागतो.
यावर्षी 12 वीच्या निकालात झालेली घसरण 10 वीच्या निकालात देखील पाहायला मिळत आहे. औरंगाबाद बोर्डात येणाऱ्या पाचही जिल्ह्यात परभणीचा निकाल सर्वात कमी लागला आहे. २०१६ मध्ये हा निकाल तब्बल ९१ टक्के 2016 मध्ये , 81 टक्के 2017 मध्ये तर 84 टक्के 2018 मध्ये निकाल देणाऱ्या परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल प्रचंड प्रमाणात घसरला आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये परभणीने मात्र निकालात (70.28 टक्के) पहिला क्रमांक पटकावला आहे. मात्र, सर्वात कमी निकाल पालम तालुक्याचा (58.54 टक्के) लागला आहे. शिक्षणात नेहमी आग्रेसर राहणाऱ्या सेलू तालुक्याची मात्र यावर्षी (69.94 टक्के) घसरण झाली आहे. अन्य तालुक्यांपैकी पूर्णेचा निकाल 62.47 तर गंगाखेड 65.81, सोनपेठ 64.22, पाथरी 65.34, जिंतूर 62.14 व मानवत तालुक्याचा 63.20 टक्के निकाल लागला आहे.
जिल्ह्यातील एकुण 424 विद्यालयांमधील तब्बल 28 हजार 964 मुला-मुलींनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला 28 हजार 119 विद्यार्थी बसले होते. यापैकी 18 हजार 657 (66.35 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 15 हजार 766 मुलांपैकी 9 हजार 386 मुले तर 12 हजार 353 मुलींपैकी 9 हजार 271 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नेहमीप्रमाणे मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदाही जास्त आहे. 59.53 टक्के मुले तर 75.5 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 16 टक्के अधिक लागला आहे.
"साडेतीन हजार विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण"
परभणी जिल्ह्यातील 10 वीच्या निकालात तब्बल 5 हजार 902 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 7 हजार 9 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. याप्रमाणेच 3 हजार 592 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह अर्थात ७५ टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. 2 हजार 154 विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
परभणी जिल्ह्यात 10 वीच्या पुरवणी परीक्षेचा देखील निकाल घटला आहे. केवळ 31.29 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 1249 पैकी 1224 विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ 383 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील 1 जण विशेष प्राविण्यासह, 5 जण प्रथम श्रेणीत, 8 जण द्वितीय श्रेणीत आणि 369 विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.