परभणी - महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मध्यरात्री दीड वाजता पॉझिटिव्ह असल्याचे समजून ॲम्बुलन्समध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याठिकाणी त्याचा अहवालच उपलब्ध नसल्याचे सांगून त्याला पहाटे 4 वाजता घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे रुग्णवाहिकेत गेलेला तो कर्मचारी पहाटे पायी घरी परतला. परंतू, इकडे त्या कर्मचाऱ्याच्या घराला आणि परिसराला सील करण्याची प्रक्रिया रात्रभर सुरू होती. ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे.
परभणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका 30 वर्षीय कर्मचाऱ्याची 12 जुलै रोजी कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यात तो निगेटिव्ह आढळून आला. तरी देखील त्याला शहरातील अक्षदा मंगल कार्यालयाच्या विलगीकरण कक्षात 5 दिवस ठेवण्यात आले. त्यानंतर तो कर्मचारी त्याच्या परभणी शहरातील माळी गल्ली भागातील घरी परतला. मात्र, काल (शनिवारी) अचानक रात्री जिल्हा प्रशासनाने तो कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे सांगून महानगरपालिकेला त्याचे घर सील करण्याचे आदेश बजावले. त्यानंतर लगेच रात्री दीड वाजता जिल्हा रुग्णालयातून आलेल्या एका रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या ठिकाणच्या कोरोना संक्रमित वार्डात त्याचा कुठलाच अहवाल आलेला नव्हता. त्यामुळे पहाटे चार वाजेपर्यंत त्याला तिथेच ताटकळत ठेवण्यात आले. मग चार वाजता त्याला तुमचा कुठलाच अहवाल आमच्याकडे नाही, तुम्ही घरी जाऊ शकतात, असे सांगितले. त्यामुळे जाताना रुग्णवाहिकेत गेलेला तो कर्मचारी पहाटे चार वाजताच्या अंधारात पायी घरी परतला.
दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सदर कर्मचारी राहत असलेल्या माळी गल्लीतील त्याचे घर सील करून टाकले. परिसरात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू केले. तसेच कोणालाही बाहेर न पडण्याच्या सूचना देऊन तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आला. तसेच पोलिसांनी देखील या परिसरातील लोकांना बाहेर न निघण्याचा आदेश बजावला. ज्यामुळे एकूणच रात्रभर परिसरातील लोक जागे राहिले. सर्वांची झोप उडाली; मात्र सकाळी परत चार वाजता परतलेल्या कर्मचाऱ्याला पाहून त्या ठिकाणचे रहिवासी अधिकच घाबरून गेले. त्यानंतर सकाळच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. त्यानुसार आज (रविवारी) दुपारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठोकलेले सील पुन्हा काढून घेतले. पोलिसांनी देखील कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना जाऊ द्या, होत असते असे म्हणून वेळ मारून नेली.
या प्रकारामुळे सदर कर्मचार्याच्या घरातील लोक अतिशय घाबरले आहेत. तर शेजार्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. मागचे काही दिवस त्या कर्मचार्याला भेटलेल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात विनाकारण भीती निर्माण झाली आहे. यापूर्वीदेखील जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला होता. तर एका पॉझिटिव्ह महिलेला निगेटिव्ह म्हणून सुट्टी देऊन टाकली होती. त्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार पुढे आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.