परभणी - जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. ज्यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदाकाठावरील शेकडो एकर जमीन जलमय झाली आहे. परिणामी शेतांना अक्षरशः तळ्यांचे स्वरूप आले आहे. आधी पावसाने झोडपलेला शेतकरी आता या पुरामुळे पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
![Hundreds of acres of land were destroyed by the flood](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pbn-gangakhed-farm-made-leak-7203748_29092020142456_2909f_1601369696_53.jpg)
या पाण्यामुळे आमचे न भरून येणारे नुकसान झाले असून, शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. याठिकाणी शेतकरी गोपाळ चौधरी, साबेर शेख यांनी नुकसानीचे पंचनामे करून शासनाने आर्थिक सहाय्य आणि पीक विमा भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी केली. तसेच महात्मा फुले समता परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष संजय सोनटक्के व प्रदीप चौधरी व अन्य काही शेतकऱ्यांनी देखील तहसीलदारांनी लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी केली आहे.