परभणी- कोरोनाच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. तसेच शेतकरी उत्पादित फळे, पिके आणि भाजीपाल्याला बाजारपेठ मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे, सेलू तालुक्यातील हातनूरच्या शेतकऱ्याला दिलपसंद विक्रीसाठी बाजार न मिळाल्याने त्याने दिलपसंदच्या शेतात चक्क मेंढ्या सोडून दिल्या आहेत.
मौजे हातनूर गावातील शेतकरी मोतीराम रोकडे यांनी आपल्या शेतात जवळपास ३ एकर दिलपसंद फळाची लागवड केली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. या पिकाच्या लागवडीसाठी रोकडे यांनी भरपूर पैसाही खर्च केला. पिकही मोठ्या प्रमाणात बहरून आले आहे. मात्र, विक्री करिता बाजारात न्यायची वेळी आली तेव्हा कोरोना विषाणूचे संकट कोसळले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात व राज्यात शासनाने ‘लॉकडाऊन’ केल्याने अनेक ठिकाणच्या बाजारपेठा बंद झाल्या आहेत. त्यामुळे, काढणीस आलेल्या दिलपसंदसाठी ग्राहक उपलब्ध होत नसल्याने दिलपसंदच्या शेतात चक्क मेंढ्या सोडण्याची वेळ रोकडे यांच्यावर आली आहे. या नुकसानीचा पंचनामा करून काही आर्थिक मदत प्रशासनाने द्यावी, अशी अपेक्षा रोकडे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- जिंतूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या