पालघर/वसई - वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मार्फत सूर्या धरणातून वसई-विरारकरांना पाणी पुरवठा केला जातो. वसईकरांना सूर्या धरणाच्या पाण्यावरच बर्याअंशी अवलंबून राहावे लागत आहे. मात्र सूर्या धरणापासून ते वसई-विरारपर्यंत जोडण्यात आलेल्या जलवाहिन्या, प्रत्यक्ष धरणाच्या ठिकाणचे पंम्पिंग स्टेशन यामध्ये अधुनमधून होणार्या सततच्या बिघाडामुळे वसईकर जनता हैराण झाली आहे. सततच्या बिघाड आणि दुरूस्तीमुळे वसईकरांचे अधुनमधून पाणी बंद केले जाते. त्यामुळे वसईकरांना पाण्यासाठी वनवास सोसावा लागतो आहे. वसईकरांनी त्यामुळे संताप व्यक्त केला आहे.
दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने -
वसई-विरार महापालिका क्षेत्रास पाणी पुरवठा करणार्या जुनी व नवीन (सूर्या योजना) पाणी पुरवठा योजनेच्या पंपाची/पॅनलची व इतर कामे पावसाळ्यापूर्वी करून घेणे आवश्यक असल्याने सदर कामे करण्याकरिता बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यंत सूर्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा 24 तासांकरीता बंद राहणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. दुरूस्तीनंतर पुढील दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने अपुरा येण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे व पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
नाईलाजाने वसईकरांना टँकरचे दुषित पाणी -
वसई-विरारकरांना पाणी पुरवठा करणार्या जलवाहिन्या अनेकदा लिकेज होतात. पंम्पिंग सेंटरमध्ये होत असलेल्या बिघाडामुळे पालिकेकडून त्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले जाते. दुरूस्तीच्या काळात वसईकरांचा पाणी पुरवठा काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी बंद ठेवला जातो. या काळात अनियमित दराने अथवा अपुरा पाणीपुरवठा देखील वसईकरांना केला जातो. जलवाहिन्यांतून गढूळ पाणी येणे असे प्रकार वारंवार उद्भवत आहेत. आधीच वसई-विरारमध्ये पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. बर्याच नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यात सातत्याने जलवाहिन्यांत होणारे बिघाड व त्यावर पालिकेचे ठरलेले रडगाणे यामुळे वसईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाईलाजाने वसईकरांना टँकरच्या दुषित पाण्याचा वापर करावा लागतो. त्याने वसईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा - माता तू वैरिणी! स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करणाऱ्या आईवर गुन्हा दाखल