पालघर - खरीप हंगामात भात पिकाच्या उत्पादनानंतर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग रब्बी हंगामाकडे वळत आहे. वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठी 50% टक्के अनुदानावर हरभरा बियाणाचे वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत हरभरा पिकाच्या प्रात्यक्षिक प्रयोगासाठी मोफत बियाणेही शेतकऱ्यांना दिले.
वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील यांच्या उपस्थितीत या बियाणांचे वाटप झाले. रब्बी हंगामासाठी शंभर क्विंटल हरभरा बियाणांची मागणी करण्यात आली होती. शंभरपैकी चाळीस क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे, अशी माहीती वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांनी दिली.
हेही वाचा - अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या आर्मीत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा
वाडा तालुका कृषी कार्यालयाकडून देखील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत मोफत हरभरा पिकाच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. हरभरा पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयोगासाठी हे बियाणे देण्यात आले. तालुक्यातील खरीवली, चिंचघर, खुपरी, बिलावली या गावांतील शेतकऱयांना याचा लाभ होईल असे, कृषी पर्यवेक्षक संजय घरत यांनी सांगितले.