वसई (पालघर) - तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बुलेट ट्रेन आणि बडोदा महामार्गासाठी गेल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून प्रांत कार्यालयात खेटे मारून सुद्धा त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. एका शेतकऱ्याने दलालासोबत केलेली बातचित व्हायरल झाली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे.
वसई तालुक्यातील अनेक गावे बुलेट ट्रेन आणि बडोदा महामार्गासाठी संपादीत करण्यात आले असून शेतकऱ्यांना या बदल्यात करोडो रुपयांचा मोबदला मिळणार आहे. मात्र, काही दलाल कार्यालयाच्या आसपास राहून मिळणाऱ्या मोबदल्यातील १५ टक्के रक्कम घेत असल्याचा ऑडीओ समोर आला आहे. याची तक्रार आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली होती. वसई तहसील कार्यालयाच्या दारावर आंदोलन केल्यानंतर काही शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. वर्षभर प्रांत कार्यालयात खेटे मारून सुद्धा आमच्या हक्काचे पैसे मिळत नव्हते. मात्र, आगरी सेनेने एकही रुपया कमिशन न घेता शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. वसईचे प्रांतअधिकारी स्वप्नील तांगडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केल आहे, की कोणत्याही 'एजंटला' पैसे देवू नका. शेतकऱ्यांकडून जर कोणीही कमिशन म्हणून पैसे घेतले असतील तर त्यांना तक्रार करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
हेही वाचा - थोडं लांबून बोल, अजित पवार मनसे नगरसेवकावर भडकले