उस्मानाबाद - करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, अनेकजण नेहमीप्रमाणेच शहरात वावरताना दिसत असल्याने संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. पोलीस बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना आवाहन करत चोपूनदेखील काढत आहेत, तरीही नागरिक काही घरात बसण्याचे नाव घेत नाहीत.
शहरात भाजीपाला मार्केटच्या नावाखाली नागरिकांची सर्रास रस्त्यावर वर्दळ दिसून येत आहे. या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, कारवाई होताना दिसून येत नाही. लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत आहेत.