उस्मानाबाद - जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटना गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसली आहे. मानधन वाढीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये यापूर्वी कोतवालांनी आंदोलन केले होते.
गावपातळीवर शासनाचा आणि गावकऱ्यांचा मधला दुवा म्हणून पोलीस पाटलांची नेमणूक केली जाते. तसेच गावचा प्रमुख घटक हा पोलीस पाटील असतो. पोलीस पाटलांना ३ हजार एवढे मानधन दिले जात आहे. या अत्यल्प मानधनामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील होत नाही. त्यामुळे शासनाने पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून १२ हजार रुपये करावे, सेवानिवृत्तीनंतर पोलीस पाटलांना ३ लाख रुपये निवृत्ती वेतन मिळावे, कुटुंबातील एकास अनुकंपा तत्वावर शासकीय कर्मचारी म्हणून घ्यावे, पोलीस पाटलांची सेवेतील वयोमर्यादा वाढवावी, २०१२ ते २०१६ या वर्षात रूजू झालेल्या पोलीस पाटलांना प्रवास भत्ता देण्यात यावा. अशा मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.