नाशिक - भगूर परिसरातील मळे भागात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. या भागातील शेतकरी अर्जुन कापसे यांच्या शेतात मागील दोन महिन्यांपासून पिंजरा लावण्यात आला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गेल्या दोन महिन्यांनापासून भगूर परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. गावातील कुत्री आणि इतर जनावरांना बिबट्याने आपले भक्ष्य केल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. नागरिकांच्या मागणीवरून वन विभागाने अर्जुन कापसे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला. मात्र, दोन महिन्यात एकदाही पिंजरा लावलेल्या ठिकाणी बिबट्या फिरकला नाही.
हेही वाचा - दिंडोरीतील द्राक्षबागांचे नुकसान; शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची मागणी
अखेर गुरूवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या भागात बिबट्याच्या दहशतीमुळे सायंकाळी सात वाजल्यानंतर नागरिक घरातून बाहेर देखील पडत नव्हते. भगूरपासून काही अंतरावर असलेल्या देवळाली कॅम्प या लष्करी परिसरातही बिबट्याने अनेकांना दर्शन दिले. त्यामुळे या भागात आणखी बिबटे असावे, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. देवळाली परिसरातही पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.