नाशिक - मनमाड जवळील भालुर गावात आज (३ जानेवारी) एकाच कुटुंबातील 8 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. प्रकृती खालावल्याने सर्वांना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले आहे.
भालुर गावातील अशोक मोरे (वय ६०), सिंधुबाई मोरे (वय ५५),सविता मोरे (वय ३०), माधुरी मोरे (वय २०), पल्लवी मोरे (वय २५), वैष्णवी मोरे (वय ११), रोहित मोरे (वय १४) आणि रोहित बर्डे या सर्वांनी ११ वाजेच्या सुमारास शेतात जाण्याआधी न्याहरी म्हणून कांद्याची भाजी, मेथीची भाजी व बाजरीची भाकरी खाल्ली होती. थोड्यावेळाने त्यांना अचानक पोटात दुखणे, मळमळणे जुलाब, उलट्या, असा त्रास होऊ लागला. सर्वांना एकाच वेळी त्रास होऊ लागल्याने त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. पोतदार यांनी उपचार केले. विषबाधा झालेल्यां पैकी काहींची प्रकृती सुरुवातीला चिंताजनक होती. परंतु, उपचारानंतर सर्वजण धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - वाशिममध्ये तेराव्याच्या जेवणातून 35 जणांना विषबाधा
सकाळी या सर्वांना त्रास होऊ लागल्याने गावातील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने सर्वांचे प्राण वाचले आहेत. सध्या कांद्यासह शेतातील इतर पिकांवर मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व औषधांचा वापर होत आहे. त्यामुळे ही घटना घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सर्व प्रकारच्या पालेभाज्या स्वच्छ पाण्याने धुवूनच खाव्यात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.