नाशिक - गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवासाठी (गोदाप्रेमी) पाठपुरावा करणाऱ्यांना अखेर यश आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेले काँक्रीटीकरण काढण्यास सुरुवात केली आहे. सिंहस्थ काळात साधुसंतांसह भाविकांना योग्य पद्धतीने स्नान करता यावे याकरिता नदीपात्रात काँक्रीटिकरण करण्यात आले होते. यासाठी सिंहस्थमधील कोट्यवधी रुपये निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, हा खर्च पाण्यात जाणार आहे. यामुळे गोदावरी नदीत प्रदूषण होण्यास भर पडण्याबरोबरच प्राचीन जलस्रोत बंद झाले होते.
हेही वाचा - नाशिकच्या आदिवासीबहुल भागात स्ट्रॉबेरी बहरली; भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर
काँक्रीटीकरणाला विरोध करत गोदाप्रेमींकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत पालिकेला काँक्रीटीकरण काढण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याच दरम्यान स्मार्ट सिटीच्या गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून सुशोभीकरण केले जाणार आहे. त्याअंतर्गत आता गांधी तलावापासून शुभारंभ करण्यात आला असून पंधरा दिवस हे काम सुरू असणार आहे. या निर्णयामुळे प्राचीन कुंड खुले होणार असून गोदावरी खळखळून वाहण्यास मदत होणार असल्याची भावना याचिकाकर्ते देवांग जानी यांनी व्यक्त केली आहे.
![Concretization removing process started in Godawari nashik](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5364471_nsk.jpg)
याचिकाकर्ते देवांग म्हणाले, "अनंत अडचणींवर मात करून गोदामाई काँक्रीटीकरण मुक्त होणार आहे. काही वर्षांपासून न्यायालयीन लढा, शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा असो त्याचे हे फलित आहे. अजून थोडी लढाई बाकी आहे. 17 प्राचीन कुंड पुनर्जीवित करायचे आहेत, गोदावरी नदी स्वावलंबी बनवायची आहे. गंगापूर धरणावर अवलंबून राहणार नाही. तीन वर्षात याचा निकाल पाहायला मिळेल. दीड किलोमीटरचे हे काम आहे. अहिल्याबाई होळकर पूल ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत हे काम असणार आहे. अनेकांनी विरोध केला पण आमचा विजय झाला आहे."
हेही वाचा - सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मला सारखेच; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले