नांदेड - जिल्ह्यात शनिवारी 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्ह्यात शनिवार 22 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 4 सप्टेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.