नांदेड - महाराष्ट्राचे विभाजन करून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र वेगळे करण्याचा डाव भाजप सरकारचा आहे. शिवाय ईसापूर धरणाचे पाणी इतर ठिकाणी वळवण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. अर्धापूर येथील युवा मंथन शिबिरात ते बोलत होते.
भाजपचा महाराष्ट्र तोडण्याचा डाव रस्त्यावर उतरून उधळून लावण्यासाठी तरुणांनी तयार राहण्याची गरज आहे. जनतेच्या विकासासाठी व एकसंघ महाराष्ट्रासाठी मी स्वतः रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी तयार आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढा देण्यास तयार असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. शंकररराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अर्धापूर शहरातील राजहंस गार्डन मंगल कार्यालयात शनिवारी युवा मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून काँग्रेसचा इतिहास तसेच कै. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छत्रपती कानोडे यांनी तर प्रास्ताविक पप्पु पाटील यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार सचिन सावंत, आमदार डी.पी.सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, पप्पु पाटील कोंढेकर, मदन देशमुख, बालाजी गव्हाने, राजु शेटे, शेख लायक, डॉ. विशाल लंगडेसह आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अर्धापूर शहरासह येळेगाव गटातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.