नांदेड - महाराष्ट्र कधीही दिल्लीश्वरांच्या पुढे झुकला नाही आणि तो पुढे झुकणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विसर पडला आहे. त्यामुळे भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत, असा घणाघाती हल्ला अजित पवार यांनी केला. ते शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार सतिष चव्हाण यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजितदादा पवार शुक्रवारी नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचार सभेत भाजपाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. माझ्या तीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत मी असे कधी पाहिले नव्हते. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागा वाटप केले. त्यामुळे आता व्यक्तिगत हेवेदावे विसरून आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीनिशी लढले पाहिजे.
भाजपचे कार्यकर्ते बिथरू नये म्हणून सत्तेचे गाजर...!
राज्यातील भारतीय जनता पक्षाचा अजित पवारांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. भाजपचे आमदार बिथरले आहेत. त्यामुळे आपल्याकडील आमदार कुठे निघून जाऊ नये, त्यासाठी भाजपाची घालमेल सुरू आहे. भाजपातील आमदारांना गाजर दाखवण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. असे असतानाही भाजपातील दिग्गज नेते एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपला आता सुरुंग लागला आहे. विकास आघाडीचे सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येत असतात. निर्णय मागेपुढे होतात. परंतु राज्याचे हित हे आमचे समान धोरण आहे. यावेळी बोलताना अजित दादा पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीच्या जागा आल्यावर देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीला रवानगी- अशोक चव्हाण
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले, की विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहेत. त्यांना महाराष्ट्रात ठेवले जाणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
अहो बोलबच्चन तुम्हीच की...!
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारला बोलबच्चन सरकार म्हटले होतं. त्याचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. बोलबच्चन हा शब्द तुम्हालाच लागू पडतो. 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन कोणी दिले होते? दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन कोणी दिले होते. नोटाबंदीचा प्रयोग यशस्वी करण्याचे आश्वासन कुणी दिले होते? असा सवाल करतान मग बोलबच्चन कोण? बोलबच्चन तर तुम्ही, आम्ही नाही, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी फडणवीसांना लगावला.
रावसाहेब दानवे कधी काय बोलतात हे मला नक्की माहीत आहे- अब्दुल सत्तार
रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडणार या वक्तव्याचा अब्दुल सत्तार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, रावसाहेब दानवे काय बोलतात ते मला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कसलाही धोका नसल्याचे ते म्हणाले.अब्दुल सत्तार यांच्या वक्त्यानं कार्यकर्त्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.
व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, डी. पी. सावंत, खासदार हेमंत पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.