नागपूर- जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात भीषण पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याचा अंदाज मुखमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना देखील आला आहे. त्यामुळे पाणी बचतीची गरज त्यांनी देखील व्यक्त केली आहे.
नागपूरमध्ये इस्त्राईल आणि कॅलिफोर्निया यांसारखे पाणी तंत्रज्ञान वापरण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव फेटरीमध्ये ग्रीन स्कायलाईन या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ.विकास महात्मे, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष निरंजन हिराचंदनी, आमदार समीर मेघे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, शेतकऱ्यांना शेताचं उत्पन्न मिळावं, आर्थिक दर्जा सुधारावा, गाव सधन व्हावं यासाठी अमृता फडणवीस यांनी यावेळी हजार फळझाडे शेतकऱ्यांना वितरित केली. अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेच्या कॉर्पोरेट उपाध्यक्ष तसेच नारेडको या रियल इस्टेट कौन्सिलच्या ब्रॅण्ड अँबेसेडर आहेत. या संस्थाच्यामार्फत फेटरी गावात ग्रीन स्कायलाईन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.