नागपूर - कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचानलयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, 'राज ठाकरे यांनी केलेले गैरव्यवहार आताचे नाहीत. 2014 पासून त्यांची चौकशी सुरू आहे. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. राज ठाकरे जर प्रामाणिक असतील तर त्यांनी या चौकशीला सामोरे जावे आणि यातून मार्ग काढावा' असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीतर्फे ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.