नागपूर - शहरात आजपर्यंत अनेक विवाह सोहळे पार पडले. मात्र, रविवारी (२० डिसेंबर) सायंकाळी झालेला विवाह सोहळा जरा वेगळा ठरला. एका दिव्यांग जोडप्याचा हा विवाह सोहळा होता. सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापडकर यांच्या पितृतुल्य सवलतीत लहानाचे मोठे झालेल्या समीर आणि वर्षा विवाहबंधनात अडकले. वधूचे पालकत्व राज्याचे गृहामंत्री अनिल देशमुख यांनी तर, वराचे पालकत्व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वीकारले होते. टाकळी येथील सद्भावना भवनात थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाचा 'वर्षा'व समीरवर झाला.
गृहमंत्री व जिल्हाधिकारी झाले व्याही -
समीर आणि वर्षा दिव्यांग म्हणून जन्माला आले. कोण कुठला? धर्म, जात, पंथ कसचाल ठाव ठिकाण नाही. शंकरबाबांनी आई आणि पित्याची जागा घेत दोघांचेही संगोपन केले. राज्याचे गृहमंत्री यांनी वर्षाचे पालकत्व स्वीकारले आणि ती त्यांची मानस कन्या झाली. समीर-वर्षाचा विवाह ठरला तेव्हा नागपूरचे प्रशासकीय प्रमुख जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी समीरचे पालकत्व स्वीकारले. एका अनोख्या पद्धतीने राज्याचे गृहमंत्री व नागपूरचे जिल्हाधिकारी एकमेकांचे व्याही झाले.
हा सोहळा नसून समाजाला प्रेरणा देणारा राष्ट्रीय उत्सव -
या दोन अनाथ दिव्यांगांना पालकत्व मिळाले. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्याचे काय. 18 वर्षानंतर त्यांना आश्रमात राहता येत नाही. कुठे जाणार ते? असा प्रश्न शंकरबाबांनी उपस्थित केला. समीर-वर्षाला पालकत्व लाभले. मात्र, ज्यांना लाभत नाही, त्यांच्यासाठी काहीतरी कायदा झाला पाहिजे. त्यांना कायमस्वरूपी राहण्याची सोय झाली पाहिजे. हा केवळ विवाह सोहळा नसून समाजाला प्रेरणा देणारा सोहळा आहे, अशी प्रतिक्रिया शंकरबाबांनी व्यक्त केली.
शंकरबाब झाले भावूक -
शंकरबाब पापडकर समाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कामचा त्यांनी कधी गवगवा केला नाही. आतापर्यंत त्यांनी 22 विवाह करवून दिव्यांग अनाथांचे संसार सुरू करून दिले आहेत. आपले वय झाल्याने कदाचित हा विवाह सोहळा आपल्या आयुष्यातील शेवटचा सोहळा असेल. या कामात प्रभाकर वैद आणि मा. गो वैद्य यांनी मदत झाली, अशा भावना शंकरबाबांनी व्यक्त केल्या.
बग्गीतून आला समीर; मेण्यातून आली वर्षा -
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मानस कन्येचा विवाह सोहळा म्हटल्यावर तो थाटातच पार पडला. कुठल्याही गोष्टीची कमी या सोहळ्यात नव्हती. नवरदेव समीर घोड्यावर बँड बाजासह दाखल झाला. सजवलेल्या बग्गीतून त्याने मांडवात आगमन केले. तर, नवरी मुलगी वर्षा मेण्यातून आली. गृहमंत्री यांचे चिरंजीव नवरीचे भाऊ म्हणून तर अनिल देशमुख वडील म्हणून स्वतः वर्षाला घेऊन आले. सोबतीला जिल्हाधिकारी दाम्पत्यही व्याही म्हणून होते.
दिग्गजांनी केला समीरवर आशीर्वादाचा 'वर्षा'व -
या सोहळ्याला नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, आमदार मोहन मते, विकास कुंभारे, माजी मंत्री अनिस अहमद, रणजित देशमुख, रमेश बंग, सतीश चतुर्वेदी, माजी खासदार दत्ता मेघे, गिरीश गांधी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माधुरी तिडके वैद्य, सलील देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. त्यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.