मुंबई - वांद्रे येथील घटनेतील एक व्हिडिओ माध्यमावर फिरत आहे. त्यात एक तरुण म्हणतो मीडिया, पोलीस कुठे आहेत? आम्हाला गावी जायचं आहे. जाऊ द्या नाहीतर रोकड 15 हजार द्या. याचा अर्थ ही घटना पूर्वनियोजित होती. ज्या ठिकाणी चार लोक एकत्र येऊ देत नाहीत, त्याठिकाणी 4 हजार लोक कशी एकत्र आली? तुमचे पोलीस कुठे होते? अशी विचारणा भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना केली आहे.
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनला झुगारून काल वांद्रे पश्चिम येथे हजारोंचा जमाव गोळा झाला. या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले. इतकी लोक अचानक आली कुठून? असा प्रश्न सामन्यांना पडला आहे. त्यातच हे सर्व करणारा एक संघटनेचा अध्यक्ष व खोटी माहिती देणारा पत्रकार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण याच्यामागे कोणाचा तरी हात आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच काल जमलेल्या लोकांमधून एक व्हिडिओ भाजपच्या किरीट सोमय्या यांना मिळताच त्यांना त्यात सुनियोजित कारस्थान आहे, असा आरोप केला आहे. तसेच तो व्हिडिओ पोलिसांना पाठवत चौकशी करण्याची मागणी केली आहे.