मुंबई - आज सेना-भाजप यांमध्ये सायंकाळी बैठक होणार होती ती रद्द झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी 50-50 अशी चर्चाच झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
24 , ऑक्टोबर रोजी विधानसभा मतदारसंघाचे निकाल लागले. त्यानंतर भाजप आणि सेना यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, सत्ता युतीचीच येणार. पण, काल, दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर भाजप आणि सेना नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधान आले होते.
त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, 50-50 फॉर्म्युला अशी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले, 50-50च्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही, असे जर मुख्यमंत्री बोलत असतील तर आपल्याला सत्याची व्याख्याच बदलावी लागेल, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री स्वतः 50-50 च्या फॉर्म्युल्यावर बोलले आहेत. उद्धव ठाकरेंनीही हे वारंवार सांगितले आहे. अमित शाहांच्या समोर हे बोलणे झाले आहे. जर आता ते म्हणत असतील की, अशी कोणती चर्चाच झाली नव्हती तर मी अशा विधानाला प्रणाम करतो. कॅमेऱ्यासमोर ते काय म्हणाले हेच ते नाकारत आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात बोलणी होणार होती.