मुंबई- लॉकडाऊन कालावधीत दारूची दुकान बंद ठेवून कोरोनाच्या प्रसाराला आळा बसला आणि दारूसाठी होणारा खर्च कुटुंबातील सदस्यांच्या भुकेसाठी होऊ लागला. यामुळे अनेकजणांनी व्यसनमुक्तीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली होती. त्यातच सोमवारी दारू बंदी उठवण्यात आली. ही उठवलेली बंदी भविष्यात घातक ठरणार असल्याची भीती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य महामंडळ सरचिटणीस वर्षा विलास यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- कोरोना : दिवसभरात ७७१ नवे रुग्ण, राज्याचा आकडा १४ हजार ५४१ वर
कुठल्याही व्यसनामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होते. हे वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटनेनेही दाखवून दिले आहे. दारूही अत्यावश्यक सेवा नाही. यामुळे सरकारला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. हाताला काम नसताना गरीब स्त्री घरचा खर्च चालवत असते. महसुलासाठी दारूची दुकान सुरू करणे योग्य जरी वाटत असले तरी त्याचे परिणाम हे फार घातक असणार आहेत.
जी लोकं शुद्धीत लॉकडाऊनचे नियम पाळत नाहीत ते दारूच्या धुंदीत नियम पाळतील का? असा सवाल वर्षा विलास यांनी उपस्थित केला आहे. यामुळे पोलिसांवरील ताण वाढणार असून गुन्हेगारी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे दारूचे दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय स्थगीत करावा, अशी मागणी देखील वर्षा विलास यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.