मुंबई : मलजल म्हणजेच शौच आणि इतर घाणीचे पाणी वाहिन्यांमधून बाहेर वाहून त्याचा त्रास नागरिकांना होतो. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. यासाठी पालिकेने मुंबईतील मलजल वाहिन्या दुरुस्त करून त्याचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मलनिःसारण सुधारणा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून मुंबई मलजल मुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख आहे. लाखो पर्यटक मुंबईत येतात. मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असून त्यात बहुतेक ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या नाहीत. मुंबईत सुमारे २०४५ किमी लांबीच्या मलनिःसारण वाहिन्या आहेत. शहराच्या क्षेत्रफळानुसार शहरातील ८४ टक्के भागामध्ये वाहिन्या आहेत. त्याचा फायदा ७४ टक्के नागरिकांना होतो. मुंबईत अनेक ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यामधून टाकला जाणारा कचरा आणि सुरू असलेले काम यामुळे मोठ्या प्रमाणात मलनिःसारण वाहिन्या खराब होत आहेत, काही वाहिन्या चोकअप होऊन घाणीचे पाणी परिसरात पसरत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
मलजल मुक्त मुंबई : मलनिःसारण वाहिन्यांमधून घाणीचे पाणी परसरत वाहत असल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी दिसत आहे. यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी आणि आजार पणाला सामोरे जावे लागते. यासाठी पालिकेने मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील मलनिस्सारण वाहिन्यांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका ७० कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे मलजल पसरुन निर्माण होणारा आरोग्यास धोका टाळता येणार आहे तसेच मुंबई मलजल मुक्त होईल, असा विश्वास पालिकेच्या मलनिस्सारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
मलनिःसारण सुधारणा प्रकल्प : मुंबईत लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता अपुरी पडत आहे. नवीन मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे विस्तारणे शक्य नसल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या मलनिस्सारण वाहिन्या मजबूत व टिकाऊ करण्यावर पालिकेने भर दिला दिला आहे. त्यासाठी पालिकेने मलनिःसारण सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. मलनि:सारण सुधारणा कार्यक्रमानुसार पालिकेच्या विद्यमान विकसित व नियोजित विकास रस्त्यांवर ९३.६८ किलोमीटरच्या लांबीच्या मलजल वाहिन्या टाकणे व त्यांचे आकारमान वाढविणे इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत.
असा केला जाणार खर्च : कुलाबा, सँडहर्सट रोड, चंदनवाडी, ग्रँट रोड, भायखळा विभागासाठी २२ कोटी ५० लाख रुपये, माटुंगा, परळ, दादर, वरळी विभागासाठी १५ कोटी रुपये, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, अंधेरी के पूर्व विभागासाठी ११ कोटी २५ लाख रुपये, अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मालाड विभागासाठी ११ कोटी २५ लाख रुपये, कुर्ला, चेंबूर पूर्व, मानखुर्द विभागासाठी ११ कोटी २५ लाख रुपये, घाटकोपर, भांडुप, मुलुंड विभागासाठी ११ कोटी २५ लाख रुपये तर कांदिवली, बोरिवली, दहीसर विभागासाठी ७ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.