मुंबई - समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 निष्पापांचा जीव गेला. अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. वाहन चालकांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःवर गुन्हा दाखल करणार का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संपूर्ण समृद्धी महामार्गाची पुन्हा एकदा एक तांत्रिक चाचणी करण्याची गरच आहे. अपघाताच्या जागा कुठे आहेत? अपघात का होत आहेत? या महामार्गावर 300 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. गेल्या काही महिन्यात शेकडो लोकांचा यामुळे जीव गेला आहे. या मृत्यूंबाबत सरकारने बोलावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. अनेक खासगी चारचाकी वाहनांचा या महामार्गावर अपघात झाले. यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. याला जबाबदार कोण? तसेच सरकारवरती समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.