मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असून राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जराही गंभीर नाही. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आज मातोश्रीवर मशाल मोर्चा आयोजित केला आहे. मात्र, शांततेत आम्ही हा मोर्चा काढत असताना आमच्या गाड्या आणि आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आले. ही सरकारची दडपशाही असून आम्ही याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया शिवसंग्रामचे सस्थापक आमदार विनायक मेटे यांनी दिली.
मशाल आंदोलन दडपण्याचा प्रयत्न तो पर्यंत येथून हालणार नाही-
सरकारकडून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी मशाल मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या विनायक मेटे यांनी दिला. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री जोपर्यंत ठोस भूमिका जाहीर करत नाहीत, आमची भेट घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असेही मेटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
मशाल मोर्चा दडपण्याचा प्रयत्न मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी-आज(शनिवारी) संध्याकाळी 5 वाजता मराठा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी धडकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार मुंबई आणि राज्यभरातून आंदोलक सकाळी मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र, त्यांच्या गाड्या मुंबईत येण्याआधीच अडवल्याचा आरोप मेटे यांनी केला आहे. मात्र असे असले तरीही सरकारच्या दडपशाहीला न जुमानता मोठ्या संख्येने आंदोलक वांद्रे येथे धडकले आहेत. मातोश्रीवर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे मराठा मोर्चाने मातोश्रीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात धडकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोठ्या संख्येने संध्याकाळी आंदोलक या ठिकाणी जमा झाले आहेत. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा बाजी करत सरकार विरोधात रोषही व्यक्त केला.
अशोक चव्हाण हटाव-मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन आहे, हे सातत्याने दिसून येत आहे. न्यायालयात सरकारने जी उदासीनता दाखवली, त्यामुळेच आरक्षण रखडले आहे. राज्य सरकारच्या आरक्षण उपसमितीकडून काहीही होताना दिसत नाही. त्यामुळे या उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांना त्वरित हटवावे, अशी मागणी यावेळी मेटे यांनी उचलून धरली आहे. तसेच जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला जोपर्यंत ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे.