मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणले जाणार आहे. याअंतर्गत मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एकूण 88 हॉटेलमध्ये मिळून 3 हजार 343 कक्ष आरक्षित केले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 7 मे पासून सुरू झालेल्या पहिल्या प्रयत्नात विविध 12 देशातून, 64 विमान फेऱ्यांमधून एकूण 14 हजार 800 प्रवासी भारतात येणार आहेत. पैकी मुंबईमध्ये एकूण 7 विमानातून सुमारे 1 हजार 900 नागरिक येतील.
बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत. परतलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केले जाणार आहे. अलगीकरण कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोना बाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. अलगीकरण करण्यासाठी मुंबईतील विविध 88 हॉटेलमध्ये एकूण 3 हजार 343 कक्ष आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन, तीन, चार, पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचा देखील समावेश असल्याचे पालिकेने म्हटले आहे.