मुंबई - येथील दहिसर रावळपाडा गावडेनगर परिसरातील ओम साईराज ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी दरोडा टाकला होत्या. यावेळी त्यांनी ज्वेलर्सच्या मालकाचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील पाचही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपींनी वापरलेला बुट हा मुख्य धागा बनला होता. असे मुंबई पोलीसचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
गुन्ह्यासाठी मध्यप्रदेशातून बोलवले होते -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर ज्वेलर्स हत्या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी दुकान मालकाची गोळी झाडून हत्या करुन दागिने घेऊन लंपास झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास करुन या पाच आरोपींना अटक केली. यातली चिराग रावल आणि अंकित महाडिक या आरोपींनी हा सर्व कट रचला होता. तर आयुष्य पांडे, निखिल चांडाळ, उदय बाली या तीन आरोपी मध्यप्रदेश राज्यातून गुन्ह्यासाठी बोलवण्यात आले होते.
गुजरातमधून आरोपींना घेतले ताब्यात -
हे आरोपी गुजरातमधील एका खेडेगावातील घरामध्ये लपले होते. पोलिसांनी सर्व प्रकरणातील कड्या जोडून त्यांना याठिकाणाहून अटक केली. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, या गुन्ह्यासाठी एका दुचाकीचा वापर केला आहे. ती गाडीदेखील दहिसर परिसरातून चोरी करण्यात आली होती. तसेच एका कारचा देखील वापर केला होता, असे त्यांनी सांगितले.
30 तोळे सोने केले जप्त -
या प्रकरणातील सर्व आरोपी हे 21 वर्ष वयोगटातील आहेत. जो संशयित आरोपी प्रथम पकडण्यात आला होता, तो कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हता. त्याचा सोशल मीडिया चेक केला. यावेळी अन्य आरोपींची ओळख पटली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील कारवाई जलद गतीने करण्यात आली. आरोपी जवळून एकूण ३० तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. अद्याप एक आरोपी फरार असून, त्याचा तपास सुरू असल्याचे मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.