मुंबई - अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर रोबो दाखल झाला आहे. जलद बचावकार्य करण्यात हातखंडा असलेला हा या प्रकारचा भारतातील पहिला रोबो आहे. बोरिवली प्रादेशिक समादेश केंद्राचे उद्घाटनप्रसंगी बुधवारी हा रोबो सेवेत दाखल झाला.
फायर रोबोतून वरच्या दिशेला 38 अंश आणि खालच्या दिशेला 30 अंश कोनात पाण्याचा मारा करता येतो. एका वेळी अडीच तास काम करण्याची क्षमता त्याच्यात आहे. हा रोबो वायरलेस रिमोटच्या साहाय्याने दीड मीटर प्रतिसेकंद या वेगाने 300 मीटपर्यंत चालवता येऊ शकतो. सकिंग अँटेना लावल्यास 1 किमीपर्यंतही चालवता येतो. प्रतिसेकंद 80 लिटर पाणी फेकण्याची क्षमता याच्यात आहे. 53 इंच लांब आणि 44 इंच उंच अशा फायर रोबोचे वजन 520 किलो आहे.
रोबो चोहोबाजूंनी आगीने वेढलेला असल्यास त्याची हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोबोच्या भोवती सतत पाण्याचा फवारा करून त्याचे रक्षण करण्याची सोय यात आहे. रोबोच्या पुढे-मागे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. नाइट व्हिजन आणि थर्मल इमेजिंग कॅमेरेही आहेत. इमेज ट्रान्समिशन आणि डेटा ट्रान्समिशन अँटेना असल्यामुळे रोबोद्वारे अपघातस्थळाची माहिती मिळवणे शक्य होईल. किती माणसे अडकली आहेत याची सुद्धा माहिती मिळेल.
फायर रोबोमध्ये असलेल्या इन्फ्रारेड सेन्सर आणि डबल वॉटर कर्टनमुळे रोबोचे तापमान नियंत्रणात राहू शकते. तसेच ऑब्स्टॅकल्स अव्हॉयडन्स सेन्सरमुळे रोबोला अडथळ्यांतून मार्ग काढण्यास मदत होईल. जॉय स्टीक, स्टियरिंग लॉक, ऑब्स्टॅकल अव्हायडन्स, रोबो वर-खाली करण्याकरता लो स्पीड बटन, रेकॉर्डिग बटन, वॉटर मॉनिटर बटन, कॅमेरा जॉयस्टिक, चार अँटेना अशी वायरलेस रिमोटची रचना आहे.