मुंबई- कोरोना काळात आलेल्या भरमसाठ बिल थकवलेल्या ग्राहकांची वीज तोडणीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आता वीज तोडणी करू नये अशा प्रकारचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कामकाजाला सुरुवात होण्याआधीच सरकारच्या विरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केली.
दोन दिवसात निर्णय
खास करून शेतकऱ्यांचे कृषी पंप आणि सामान्य वीज ग्राहकांची वीज तोडणी करण्याचे दिलेल्या आदेशावर विरोधकांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या पायर्यांवर घोषणाबाजी केली. तसेच विधानसभेचे कामकाज सुरू होताच राज्यात सुरु असलेल्या वीज तोडणीचा विषय महत्त्वाचा असून त्यावर आधी चर्चा झाली पाहिजे असे सांगत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात कोणाचीही वीज तोडणी केली जाणार नाही, असा आदेश दिला. थकित वीज बिलाचा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्र बसून वीज बिलासंदर्भात नेमके काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची चर्चा येत्या दोन दिवसात केली जाईल असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.