मुंबई - कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरित मजूर मुंबईत अडकले आहेत. वाहतुकीची कोणतीही सुविधा नसल्याने या अडकलेल्या मजुरांनी गावी जाण्यासाठी कुर्ला नेहरूनगर परिसरात शिवसेना शाखेसमोर गावी जाण्याचा अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली आणि पोलीस येताच सर्व पसार झाले.
मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत हाताला काम मिळेल म्हणून अनेक राज्यातील लोक येतात. मात्र, अचानक लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने वाहतुकीचे सर्वच मार्ग थांबवले असल्याने 3 मे नंतर वांद्र्यात घडलेल्या प्रकाराप्रमाणे मजूर लोकांचा उद्रेक होईल, या भीतीने राज्य सरकारने केंद्रांना मार्ग काढण्यासाठी आग्रह केला होता. केंद्राने राज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्यानंतर प्रत्येकाला आपले घर जवळ करावे वाटू लागले आहे.

दरम्यान, कुर्ला नेहरूनगर येथे आज वेगवेगळ्या राज्यातील लोकांना जाण्यासाठी एक अर्ज भरण्यासाठी शिवसेना शाखेसमोर लोकांनी गर्दी केली होती. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली. लोक अर्ज भरण्यासाठी शारीरिक अंतर ठेवत नसल्याने पोलिसाना पाचारण करण्यात आले, यावेळी लोकांनी घटनास्थळी वरून पळ काढला आणि पोलिसानी हे काम बंद केले.