मुंबई - भाजपच्यावतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'फिर एक बार शिवशाही सरकार' ही विकास यात्रा काढणार आहेत.यापूर्वी भाजपशासित राज्यात संबंधित मुख्यमंत्र्यांनी विकास रथयात्रा काढल्या आहेत. पण महाराष्ट्रात पाहिल्यांदाज असा प्रयोग होत असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भाजपच्या पदाधिकारी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप-शिवसेना सरकारने केलेल्या कामाचा प्रसार मुख्यमंत्री या यात्रेत करणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांची ही स्वतंत्र यात्रा असली तरी महाराष्ट्राच्या विविध भागातले नेते आणि मंत्रीही त्या-त्या ठिकाणी या यात्रेत सहभागी होतील. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी संख्या वाढवणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. २८८ मतदार संघात बूथ रचना मजबूत करताना प्रत्येक ठिकाणी पाच बुथचे युनिट तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार पक्षाकडून २० हजार बुथ युनिट प्रमुखांमध्ये समनव्य साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत युतीची प्रत्येक जागा निवडून आली पाहिजे तसेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी २८८ पैकी २२२ जागांचे लक्ष दिले असल्याने, हे लक्ष साधण्यासाठीच पक्षाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.