मुंबई :केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी भाजपा महाराष्ट्रतर्फे लोकसभा प्रवास योजना आजपासून सुरू होत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी आज मुंबईत भाजप (BJP) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. संघटनात्मक बळकटीसाठी स्वतंत्र योजना आखल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
नितीन गडकरी ७ लोकसभा मतदार संघाचे प्रभारी : चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजना राज्यात चालू आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रवास करत आहेत. त्याच पद्धतीने राज्यातील अन्य १७ लोकसभा मतदारसंघात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक बळकट करण्याचे काम होईल. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे (सांगली), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (लातूर व मावळ) केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड (परभणी व धुळे) केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (नाशिक) आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील (रावेर आणि सोलापूर) या केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात इतर लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बळकटीचे काम होईल. केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा संबंधित लोकसभा मतदारसंघात एक दिवसाचा प्रवास करतील व त्यामध्ये संघटनात्मक आणि सार्वजनिक स्वरुपाचे कार्यक्रम असतील. ही योजना आज सुरू झाली आहे. तसेच राज्याच्या लोकसभा प्रवास योजनेचे मुख्य संयोजक किशोर काळकर आहेत, केंद्रीय लोकसभा प्रवास योजनेचे प्रभारी माजी मंत्री बाळा भेगडे आहेत.
संघटनात्मक बळकटीसाठी स्वतंत्र योजना : पुढे ते म्हणाले की, राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बळकटीसाठी एक स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार आहे. त्याची जबाबदारी आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली.