मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. कोकणासह राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये भाजपकडून जिंकण्याचा दावा केला जात असून त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
निवडूण येणारा, मी तुमचाच आहे म्हणतो -
मी मागील तीस वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहत आलेलो आहे. आमच्याकडे सुद्धा 2 गट निवडणुकीसाठी उभे राहतात आणि त्यातील जो निवडून येतो, तो मी तुमचाच आहे, असे म्हणतो. आम्ही सुद्धा त्यांना जवळ घेऊन त्यांचे स्वागत करतो. मात्र, या निवडणुकीत उभे राहणारे कोणत्याही पक्षाच्या निवडणूक चिन्हावर नसतात. त्यामुळे उमेदवार पक्षाचा आहे, असे म्हणता येत नाही. मात्र, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा राज्यातील मोठे साखर कारखान्यांचे पॅनल येथे मात्र या निवडून आलेले लोक पक्षाचे असतात. हे पण त्या निवडणुकीच्या दरम्यान कळते, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.
निवडणूक एकत्र लढायची इच्छा -
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काल मुंबईत काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे सुतोवाच केले होते, त्या संदर्भात विचारले असता, राज्यात आम्ही महाविकासआघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत आहोत. शिवाय ही निवडणूक एकत्र कशी लढायची यासाठीचा निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे प्रमुख घेतील. मात्र, मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढावी, अशी आमची इच्छा आहे. विशेष म्हणजे मताचे विभाजन होऊन त्यातून तिसऱ्याला लाभ होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - हॉकीची 'मक्का' म्हणून ओळखले जाणारे पंजाबमधील संसापूर गाव