मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने व्यावसायिकांना आणि नागरिकांना विविध नियम घालून दिले आहेत. मात्र, या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे वरळीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पबवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांना दिली.
नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई -
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने पुन्हा कंबर कसली आहे. मुंबईत रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बार, पब आणि नाईटक्लबसाठी एसओपी तयार केली आहे. या नियमावलीचे पालन करावे, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. मात्र, वरळीतील काही पबकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मुंबई मनपामार्फत त्यांच्यावर कारवाई केली आहे. वेळेनंतर पब सुरू ठेवणाऱ्यांवर आणि एसओपीचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.
लसीकरण वेगात सुरू -
मुंबईत गुरुवारी 43 लसीकरण केंद्रांवरील 177 बूथवर एकूण 22 हजार 975 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 19 हजार 574 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 401 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 83 हजार 288 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 2 लाख 49 हजार 620 लाभार्थ्यांना पहिला तर 33 हजार 668 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 1 लाख 44 हजार 029 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 3 हजार 313 फ्रंटलाईन वर्कर, 32 हजार 818 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 3 हजार 128 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.