मुंबई - महापालिका शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, अद्ययावत सुविधा, मोफत बेस्ट बस पास, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला-क्रीडागुणांना प्रोत्साहन दिले जाते. शिक्षणाचा हा अत्याधुनिक पॅटर्न राज्याच्या खेड्यापाड्यात पोहोचल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्र शिक्षणात देशात 'नंबर वन' होईल, असा विश्वास राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेच्यावतीने वरळी येथे आयोजित 'रायजिंग स्टार्स' कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले कला-क्रीडा गुण कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
पालिकेच्या बाराशे शाळापैकी ५०० क्लासरूमध्ये व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. ४७ हजार विद्यार्थी टॅबच्या माध्यमातून शिकत आहेत. ५३ हजार विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पासची सुविधा देण्यात आली आहे. पालिका शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, तमीळ, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू अशा आठ भाषांमधून शिक्षण देण्यात येत आहे. आता या आठ भाषांव्यतिरिक्त 'टेक्नॉलॉजी' ही नववी भाषा शिकवण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका-नगरपालिका शाळांमध्ये देऊन महाराष्ट्राचे शिक्षण देशात 'नंबर वन' बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी महिलांची माफी मागावी -
राजकीय विधानांवर मी सहसा भाष्य करीत नाही. मात्र विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका करताना महिलांचा अवमान केला आहे. महिला कमकुवत आहेत म्हणून बांगड्या घालत नाहीत. हातात बांगड्या घालणार्या महिलाही शूर असतात. महिलांना कमी लेखण्याचा जमाना आता राहिला नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांनी महिलांची माफी मागावी, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.