मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटावर ५० खोकेचा आरोप करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यात ही घोषणेची चर्चा आहे. सततच्या आरोपामुळे शिंदे गटाची प्रतिमा डागाळत असल्याने शिंदे गटाकडून मानहानीची कायदेशीर नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.
50 खोके घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजपबरोबर हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. पण भाजपसोबत जाण्यासाठी शिंदे गटातील आमदारांनी 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो आहे. राज्यातील जनतेत ५० खोकेची चर्चा आहे. सततच्या या टीकेला शिंदे गट वैतागला असून आता थेट कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवतारे यांनी दिली आहे. यावेळी शिंदे गटाने प्रवक्ते पदी नियुक्ती केल्याचे ते म्हणाले.
मानहानीचा दावा ठोकू युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 50 खोक्यांवरुन आरोप केले होते. हे आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागा असे आवाहन शिंदे गटाकडून करण्यात आले आहे. मात्र, माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात अडीच हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकू, असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. तसेच पुरावे नसताना आरोप केले जात आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी शिवराळ भाषा वापरल्याचे शिवतारे म्हणाले आहेत.