मुंबई: आज सकाळी १०. ५० वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई पोलीस भरतीदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना विद्यापीठाच्या मैदानावर वाशीम येथील एका २६ वर्षीय गणेश उगले याचा १६०० मीटर धावांच्या शर्यतीदरम्यान मृत्यू झाला, असे बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्राम अभ्यंकर यांनी सांगितले. गणेश उगले याने अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेच तो खाली कोसळला आणि रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. सध्या गणेश उगले याचा मृतदेह त्याचे नातेवाईक येईपर्यंत नायर रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
शारीरिक चाचणी दरम्यान मृत्यू: बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्राम अभ्यंकर सांगितले की, गणेश उगले हा चक्कर येऊन खाली कोसळला तेव्हा त्याच्यासोबत आलेला त्याचा चुलत भाऊ देखील घटनास्थळी उपस्थित होता. गणेशने पोलीस ड्रायव्हर कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केला होता आणि तो गुरुवारी दुपारी वाशीमहून मुंबईत शहरात आला होता. त्यानंतर तो दादर येथील आपल्या नातेवाईकांकडे राहिला. रात्रीचे जेवण करून झोपला आणि शुक्रवारी सकाळी नाश्ता करून मुंबई पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी प्रक्रियेत सहभागी झाला. आज सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास उमेदवाराने १६०० मीटर शर्यतीत भाग घेतला. गणेशने धावत जाऊन १६०० मीटर अंतर कापले. मात्र, दुर्दैवाने अंतिम रेषा ओलांडताच तो रनिंग ट्रॅकवर कोसळला. ऑन-ड्युटी वैद्यकीय पथकाने गणेशची तपासणी केली. त्यानंतर त्याला सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
गणेश हा शेतकरी कुटुंबातील: गणेश उगले हा पोलीस होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून मुंबईत आला होता. तो शेतकरी कुटुंबातील असून त्याचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाल्यानंतर गणेशचे शवविच्छेदन करायचे की नाही यावर निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल. पोलिसांना अद्याप मृत्यूचे कारण कळाले नाही. शवविच्छेदनानंतर कारण समोर येईल असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वीही भरतीदरम्यान मृत्यू: राज्यात पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी शारीरिक चाचण्यांना सुरूवात करण्यात आली आहे. पण यापूर्वी राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीत काही तरूणांना आपला जीव गमावावा लागला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. शुभांगी पारकर यांनी तरूणांना शारिरीक चाचणीसाठी आरोग्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले आहे.
हे उपाय करा: डॉ. शुभांगी पारकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीला जाण्यापूर्वी घरातील सौम्य आहार हा चाचणी अगोदर घ्यावा. तसेच अतिउत्साही होऊन शारीरिक चाचणी देऊ नका. मन शांत प्रसन्न ठेवून शारीरिक चाचणीला सामोरे जा. जेणेकरून डिप्रेशनमध्ये न जाता उत्साहात तुम्ही तुमची चाचणी देऊ शकाल. शारीरिक चाचणी अगोदर तज्ज्ञांकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक चाचणीसाठी जे प्रकार विचारणार आहेत त्याबाबत सराव करून घेणे देखील महत्त्वाचे आहे. पाणी प्यावे तसेच सकस आहार असावा. स्वतःची पूर्ण काळजी घ्या. ही केवळ परीक्षा आहे. त्यामुळे सर सलामत तो पगडी पचास, असा पोलीस भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांसाठी डॉक्टर शुभांगी पारकर यांनी सल्ला दिला आहे.